अमृतसर म्हणजे अमृताचं सरोवर अन् त्यात उभं असलेलं हे सुवर्ण मंदिर उर्फ हरमंदिर साहिब. ‘हरमंदिर’ म्हणजे सर्वांच्या ईश्वराचं राहण्याचं ठिकाण!
शिखांचं प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या ह्या मंदिरात सर्व जात-धर्माच्या व्यक्तींना मुक्त प्रवेश असतो. इथे येताना आपले पाय धुवून आणि डोकं झाकून यावं एवढंच बंधनकारक असतं. ही दोन बंधनं पाळून हे मंदिर बघणं हा एक विलक्षण अनुभव आहे!
मानवनिर्मित सरोवराच्या मध्यभागी असलेलं, सोन्याचा मुलामा दिलेल्या पत्र्यांनी लखलखणारं हे मंदिर केवळ अविस्मरणीय आहे. हे मंदिर भारतावर झालेल्या अनेक आक्रमणांमध्ये पाडलं गेलं; पण शीख बांधवांनी ते पुन्हा नव्याने बांधलं, अधिकाधिक समृद्ध करत नेलं.
हे आध्यात्मिक मंदिर आहेच; पण तितकंच आपल्या शीख बांधवांच्या लढवय्या वृत्तीचं जितंजागतं स्मारकही आहे!
मंदिराच्या परिसरात शिरल्यावर जाणवते ती कमालीची स्वच्छता आणि शांतता. रोज लाखभर माणसं भेट देत असलेल्या ह्या मंदिरात कचऱ्याचा टिपूसही कुठे दिसत नाही! आणि एका वेळी दहा-वीस हजार माणसं दर्शनाच्या रांगेत उभी असली तरी कुठे गडबड, गोंधळ, धुडगूस, आरडाओरडा काही काही नाही!
शिवाय मुख्य देव्हाऱ्यात खूप गर्दी असली, तरी धक्काबुक्की, ढकलाढकली नाही. भक्तांना हाताला धरून बाहेर काढणारे ‘लालबागी राजे’ कार्यकर्ते नाहीत. (इथेही कार्यकर्ते असतात; पण ते भक्तांना हात जोडून पुढे जायला विनंती वगैरे करत असतात!)
गंमत म्हणजे ह्या इतक्या साऱ्या गर्दीत जिथे जागा मिळेल तिथे बसून निवांतपणे ध्यान करणारे भाविकही दिसतात. त्यांना कोणी हाकलत बिकलत नाही!! शिवाय इथल्या लंगरमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला त्याची जात-धर्म वगैरे काही न विचारता पोटभर जेवण प्रेमानं वाढलं जातं. (अन् तिथेही काही ढकलाढकली, आरडाओरडा, गोंधळ नसतो!)
दररोज लाखभर लोक जिथे जमतात तिथली स्वच्छता, शांतता, सौंदर्य अन् त्या जागेचं पावित्र्य टिकवून ठेवणं शीख संप्रदायाला कसं काय जमलं असावं याचं मला राहून राहून आश्चर्य वाटलं!
अन् हे सारं टिकवून असलेलं ठिकाण हे ‘हरमंदिर’ म्हणजे सगळ्यांच्या ईश्वराचं मंदिर असावं अन् ते जिथे आहे ते अमृतसर, म्हणजे अमृताचं सरोवर आहे ह्याची खात्री पटली. अन् आपोआप माझ्याही ओठांमधून शब्द आले,
जो बोले सो निहाल, सत् श्री अकाल!!
- प्रसाद शिरगांवकर